सावली माडगूळकरांची...!!
मोठी माणसं सांगत असतात आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर त्याविषयी बोलू नये....आणि लिहू तर अजिबातच नये. पण मोह अनावर झाला आणि तो का झाला हे खाली कळेल च...अर्थात लहान तोंडी फारच मोठा घास म्हणावा लागेल याला..
आपण मोठे होतो आणि होताना आजबाजूच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला old fashioned वाटायला लागतात, आणि आपण नवीन गोष्टी मधे धुंद होतो. त्या बऱ्याच गोष्टी मधे संगीत हे पहिल्या तीनात येत असाव. त्यात आपल्याला भावगीत भक्तीगीत वगैरे अस नुसत ऐकलं तरी हे काय बोरींग किंवा म्हाताऱ्यांसारख देवाची गाणी लावलीयत अस होत जे वयानुसार साहजिक आहे. माझ्या ही शाळा कॉलेज पासून आणि मोबाईल हातात आल्यापासून त्यात मराठी हिंदी देशी विदेशी गाण्याच्या कित्येक playlist फोन मधे बनवलेल्या होत्या. त्यात आता सोने पे सुहागा म्हणता येईल अशी आपल्याकडे एक अफाट गोष्ट आहे ती म्हणजे वेग वेगळे बँड्स जुन्या गाण्यांना नवीन वर्जन मधे म्हणतात काही रिमेक तर काही फक्त नवीन गायक तर काही फक्त नवीन म्युसिक लाऊन वगैरे. यांच्या कल्पना भन्नाट असल्या तरी ही लोकं काही गाण्याचं अगदीच वाभाड काढतात तर काही अगदीच लाजवाब बनतात. झालं अस की काही महिने आधी एकदा you tube वरती फिरत असताना एक मराठी गाण लागलं पहिल्या दोन ओळी ऐकल्या-" दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा..!!"
2 सेकंद थांबलो, कारण भरपूर मराठी गाणी ऐकत असलो तरी ती समजायला विचार करायला लागावा इतकं जड ऐकून सवय नव्हती. ते शब्द सरळ असले तरी अर्था मधे ताकद होती हे नक्की. रोज बाहेर पिझ्झा बर्गर पंजाबी चायनीज कॉन्टिनेन्टल फूड खाऊन एखाद वेळी अचानक घरी पुरणाची पोळी अन् कटाची आमटी खावी आणि वाह क्या बात है अस तोंडातून पडाव हे अगदी तसच काहीतरी होत. गाण्याचं ध्रुवपद तर ऐकलेल वाटत होत. मूळ गाण शोधून घेतल. नंतर काही दिवस ते गाणं अनेक वेळा ऐकलं. खूप दिवसानंतर गाण्यातल्या गोडव्यापेक्षा शब्द आणि अर्थ यावर फोकस आला होता. म्हणून ते गाणं कुठल आहे कोणी गायल आहे यापेक्षा इतकं सॉलिड कुणी लिहील आहे याचा शोध घेण्यात लक्ष होत. ते शब्द होते ग. दि. माडगुळकर उर्फ गदिमांचे.
तस नाव नवीन नसल तरी गीतकार आणि कवी म्हणून गदिमा नावाचं कुतूहल पुन्हा नव्याने जाग झालं. नेहमीच्या आपल्या खबऱ्याला गूग्ल्या ला विचारलं आणि त्याने क्षणात वेग वेगळ्या लिंक मधून माहिती दिली. त्याची गीतांची यादी बघून मी अक्षशः आ वासला. कारण यादी खूप मोठी होती आणि त्यातली कित्येक गाणी गेल्या 5-10 वर्षात स्वतः ठरवून अशी ऐकावी अस काहीच नव्हत त्याल कारण तेच सगळी old fashioned असतील असा स्टॅम्प मारला होता पणं एक नक्की, ऐकली नसली तरी तीच गाणी रोज ऐकतो की काय इतकी सवयीची वाटली. गाण्याचं नाव वाचल तरी पुढच्या ओळी अचूक येत होत्या जिभेवर. १०-१५ मिनिटांसाठी का होईना पण सगळी वर्ष आणि आणि त्यावेळी ऐकू येणारी गाणी आणि तेव्हा बोर वाटणारी काही गाणी अचानक छान वाटायला लागली होती. आधीच का नाही ऐकली अस वाटू लागलं. जस परगावी गेल्यावर गावचा तोंड ओळख असलेला माणूस भेटावा आणि तिथं तो जवळचा वाटून काही वेळ गप्पा व्ह्याव्या आणि आधीच ओळख का नाही झाली आपली अशी खंत यावी अस काहीस. तशी यादी फार मोठी आहे पणं काही निवडक उल्लेख टाळू शकत नाही.
आता मराठी शाळेत शिकल्यानेे बालगीत आणि कविता ऐकतच आम्ही शाळा शिकलेली होती पणं सगळ्या गाण्यामध्ये 'नाच रे मोरा', 'गोरी गोरी पान' तर होतेच पण 'शेपटीवल्या प्राण्याची सभा' भरवणारे, आणि 'झुक् झुक अगीन गाडी' मधे फक्त शिक्रण येणाऱ्या मामीला सुगरण बनवणारे गदिमा होते हे कळल तेव्हा त्यांची सहजता लक्षात आलीच पणं सोबत लहान मोठ्याना आजही गुंतवून ठेवत अस 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख'बघून त्यातली प्रतिभा पणं जाणवली कारण लहान मुलांना साधं बोलण जिथं अशक्य तिथे त्यांनी motivational गाणं बिण लिहील होत त्यातल्या 'एके दिनी परंतु पिलास त्या कळाले' ऐकताना आजही तोच आनंद होतो जो तेव्हा व्हायचा. या सगळ्याचा कडेलोट म्हणजे एका बाजूला 'आईसारखे दैवत साऱ्या' म्हणायचं आणि दुसरीकडे 'आई आणिक बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला' अस विचारायचं हा विरोधाभास गदिमा च साधू शकले. स्वातंत्र्य दिनी आणखी एक गाणं हमखास लागायचं ते म्हणजे, 'हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेशितांचे' त्यात एक अफाट कडव आहे 'आता नको निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने'. या एका ओळीतं पराभव पच्वण्याची गरज आणि कुरुक्षेत्रची व्यापकता डोकावते.
आणखी दोन गोष्टींची ही या यादिने जुनी सफर घडवून आणली ती म्हणजे घरात असणारा एक कीर्तनकार आणि दुसरा रेडिओ. त्यातला कीर्तनकार होते त्यांचं 'कानडा राजा पंढरीचा', 'विठ्ठला तू वेडा कुंभार' आणि 'झाला महार पंढरीनाथ' आवर्जून ऐकत नसलो तरी कित्येकदा कानावर पडलेल होत पणं जाणवलेली गोष्ट ही एकच कवीने विठ्ठलाला राजा, कुंभार आणि महार बनवून आणि तिन्ही भूमिकांमध्ये चपखलपणे नुसत बसवल नव्हत तर त्याला न्याय ही दिला होता. आणखी ही असच एक गाणं 'नाही खर्चीली कवडी दमडी, नाही वेचला दाम, बाई मी विकत घेतला शाम' या गाण्याचं संदर्भ तर अच्युत गोडबोले नी त्यांच्या अर्थात या अर्थविषयक पुस्तकात दिलं आहे त्यात त्यांनी या गाण्याने सुरू करून पैसा आणि चलन यात कवडी आणि दमडी ची किंमत काय इथून सरू केलं आणि आणि त्यावेळी गदीमा ना हे सुचाव हे नवलच. दुसरा आहे रेडिओ जो माझ्या वयाची पहिली १५ वर्ष नित्यनेमाने घरात वाजायचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी किंवा उस्मानाबाद केंद्रावरून अस सुरू होणारा आवाज २ तास तरी नक्की चालायचा मग त्यात ऐकलेली गाणी आज परत त्या यादीत दिसली जस की 'देव देव्हाऱ्यात नाही, संथ वाहते कृष्णामाई, घन घन माला नभी दाटल्या, तुझे रूप चित्ती राहो, खेड्या मधले घर कौलारू, एक धागा सुखाचा' या एक ना अनेक गाणी आणि त्याचे वेग वेगळे अर्थ यातुन गदिमांच शब्दसामर्थ्य न कळल तरच नवल. पुढे टीव्ही वर चालणाऱ्या रियालिटी शोज मधे पणं काही गाणी पेटंट येऊ लागली अर्थात सगळी आवडत नसली तरी आता सवयीची झाली होती जस की 'कशी झोकात चालली कोळ्याची पोरं, गोमू माहेर ला जाते हो नाखवा, पदरवरती जरतरीचा किंवा एक हौस पुरवा महाराज' वगैरे वगैरे. नंतर कुठे तरी ऐकलेली आणि मनात घर करून गेलेली 'या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपुल्या किंवा फिटे अंधाराचे जाळे असेल....या दोन्ही वर तर कोणालाही काही वेगळे सांगायची बोलायची गरज पडणार नाही. ऑफिस मधे गाणी वाजायची अर्थात सगळी नव्या फिल्म्स ची पणं मधेच कोणा एका मोठ्याला 'रम्य हि स्वर्गाहून लंका' किंवा 'एकवार पंखावरून लावायची' हुक्की येई तेव्हा ती ही पक्की मनात बसली गेली होती. ही झाली वेगवेगळ्या ठिकाणी ऐकली म्हणून लक्षात राहिलेली गाणी पणं त्या सोबतच काही गाणी त्यांच्या वेगळेपणा मुळे लक्षात राहिली. त्यात एक म्हणजे 'वेदमंत्रहून आम्हा वद्य वंदेमातरम्' तेव्हा गदिमांना ही कोणी भेटला होता का वंदे मातरम् नको म्हणणारा हे त्यांनाच माहिती ( राजकीय पोस्ट कानाला खडा), दुसर 'बहरला पारिजात दारी' लहानपणी घरी पारिजात होता तेव्हा त्याची फुल बाहेर पडायची तेव्हा आजी म्हणाली होती हा तर गुणधर्म आहे याचा आणि यावरच गाणं देखील आहे 'बहरला पारिजात दारी, का फुले पडती शेजारी' त्यामुळं ते लक्षात राहील होत आणि तीसर घन निळा लडि वाळा झुलवू नको हिंदोळा यात म्हणे एकदा गदिमांना कोणी म्हणालं होत ळ हे अक्षर फक्त मराठीत आहे त्याचा उपयोग काय आणि त्यांनी चॅलेज घेऊन गाणं लिहल यात प्रत्येक संपूर्ण गाण्यामध्ये १२-१५ वेळा ळ असलेले शब्द वेगळ्या अर्थाने घेण्यात आलेले आहेत आहे. याला भाषा प्रभुत्व इतकंच म्हणता येईल. अशा पद्धतीने वेग वेगळ्या ठिकाणी प्रत्येक वळणावर जिथे गाण कानावर पडत होत तिथे गदिमांची सावली होतीच पणं ती त्यांची होती हे नंतर कळलं.
हे सगळं लिहिण्याच कारण होत ते गाणं ज्याने हे सगळं सुरू झालं म्हणजे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्रिकालाबाधित सत्य का काय म्हणतात ते या गाण्यातून इतकं सहज मांडल गेलय की बास. यात अनेक ओळी परत परत ऐकाव्या अशा आहेत मग सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत असेल किंवा दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट किंवा नको आसू धाळू आता पुस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अशा ओळींनी गाण्याला गीतरामायण पुरत न ठेवता सगळीकडे योग्य होईल त्या उंचीवर नेऊन ठेवलं. रामायणातील ५६ प्रसंग निवडून त्याला एका गीत रामायण गुंफन हा खाऊ नक्कीच नाही. जाणकार गायक म्हणतात या काव्यामधे सगळे राग छंद मात्रा परिपूर्ण आहे आणि म्हणून याला कित्येक गायक आणि कवींनी सुद्धा परिपूर्ण काव्य अस म्हणलय यात सगळे भाव आणि ९ रस पूर्णपणे योजिले गेले आहेत जसे की आपण गाण्याची नाव वाचली तरी लक्षात येईल यात बालगीत, हट्ट, दुराग्रह, आज्ञा, मागणी, आर्जव, स्त्री हट्ट, संताप, सूड, कर्तव्य, मित्र भाव, कान उघाडणी आणि विजयोत्सव हे सगळ आहे. एक कवी इतक्या फक्त एक वर्षात ५६ गाणी लिहितो आणि बाबूजी त्याला चाल देतात. हे केवळ अविश्वसनीय आहे. या दोघांनी त्याचे १८०० पेक्षा जास्त कार्यक्रम केले आणि या लिखाणा मुळे ते आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून गौरवले गेले.
माझी बॅच 90s ची, मराठी शाळा, मराठी ऐकणारे बोलणारे वाचणारे आजूबाजूला त्यांच्यामुळे अजून तरी अशी भाषेतली पुरणपोळी खाल्ली की वाह पडतच तोंडातून आणि हेच सगळ कानावर पडलेल आहे लहानपणापासून म्हणून ते nostalgic काय म्हणतात तस व्हायला होत. यावर्षी गदिमा आणि पुल यांची जनशताब्दी म्हणून हे लेख निमित्त पणं आणखी काही वर्षांनी कोणी गदिमा आणि कोण पुल अशी वेळ येईल अशी शक्यता निर्माण झालीच आहे कारण फुटकळ लेखक आणि what's app वरचा इतिहास यामुळं सगळेच ज्ञानी झालेत आणि चंचल झालेत. पण असल ऐकून वाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले त्यात आम्ही आम्ही हेच काय ते समाधान....जाता जाता एक महत्त्वाचं, मला काहीही वेगळ माहिती नाही जे मी यांच्या विषयी लिहू शकेन म्हणून संकलन स्वरूपाचा हा प्रयत्न. त्यांनी सेतू बांधा रे गाणं लिहल होत लंकेला जातानाचा प्रसंग लिहिताना. पण ते लेखक, त्यांचं साहित्य आणि ती रसिकता यात एक अंतर पडत चाललाय हे खरं आणि हा सेतू कोणी एक जण बंधू शकणार नाही तो ज्याचा त्यांनी बांधावा लागेल हे नक्की.....छोटा प्रयत्न गदिमा जन्म शताब्दी वर्षा निमित्त
©प्रसन्न कुलकर्णी [Pk]
Comments