एके वारी कैक सवारी


       सवारी? शीर्षक जरा वेगळं आहे ना? नुसतं यमक जुळल म्हणून टाकल अस वाटण अगदीच स्वाभाविक आहे पण फक्तं तितकंच नाहीय. कारण आपल्याकडे तीर्थक्षेत्र आणि त्याचे उत्सव खूप आहेत आणि त्याविषयी जगभर आस्तिक आणि नास्तिकाना देखील आकर्षण आहे. कारण ही क्षेत्र ऊर्जेचा स्रोत आहेत किंवा प्रेरणा आहेत. त्यातलीच एक आपली वारी. ही मी लहानपणापासून पाहतोय, ऐकतोय अन् त्याविषयी वाचतोय शिवाय दोन वर्षांपूर्वी एक दिवसासाठी का असेना पण ४ पाऊले अनुभवली ही आहे. पण नुसत्या निरीक्षणाने ही त्याच्या भव्यतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि यात एक नक्की समजू शकत की वारी एक आहे पणं त्यात सवारी कैक आहेत. जशा कि वारकऱ्यांच्या समता व भक्तीची, दिंड्या आणि वारी व्यवस्थापनाची, सेवाभावी लोकांच्या माणुसकीची, असंख्य छोटे व्यापाऱ्यांची, अभ्यासू व जिज्ञासूंची, शेवटी यजमान पंढरपूर आणि चंद्रभागेच्या अगत्याची....!!! एकेका विषयावर पुस्तक लिहीता येईल एखाद्याला इतका याचा अवाका आहे.
        पहिली सवारी वारकऱ्यांची भक्ती याला व्यक्त करावे असे शब्द जगात कुठेही सापडणार नाहीत. कर्मयोगाचा पुरस्कार करणारा विठ्ठल आणि कसला ही त्रास झाला तरी दर्शनाची तीच आस ठेवणारा त्याचा भक्त हे कल्पने पलिकडचे आहेत. प्रश्न समतेचा म्हणालं तर एक गोष्ट मला फार भावली आपलं नाव गाव हुद्दा वय लिंग काहीही असो, जातीच म्हणालं तर तुकाराम कुणबी, ज्ञानेश्वर ब्राह्मण, सेना नाव्ही, सावता माळी, नामा शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, चोखा महार तर कान्होपात्रा वारांगना पैकी कोणाचंही बोट पकडून जा वारीत पणं तुम्हाला हाक पडते ती एकाच नावांनी म्हणजे माऊली. ही एकच ओळख राहिली तर गर्व करणार कसला ना? उरलाच थोडाफार ' मी' पणाचा तर चालून चालून घामासोबत तोही गळून पडत असणार याला दुमत नाही.
         दुसरी सवारी म्हणजे वारीचा केंद्रबिंदू म्हणजे दिंडी व पालखी. शेकडो वर्षांची परंपरा, लाखो लोकांचा समूह आहे. पण शिस्तीमधे काही फरक पडला आहे, काही गोंधळ उडाला आहे, २ दिंड्यां मधे काही वाद झाला आहे अस ऐकिवात नाही. गल्लीतल्या २ गणेश मंडळामध्ये सुधा भांडण होत असतात पणं इथे लाखोंनी लोक असले तरी हे सहकार्य वाखाणण्याजोग. कारण त्यांचं वेळापत्रक, क्रम आहे तसाच आहे. कोण कसा जाईल, कुठे मुक्काम, मार्ग, सगळ कस पूर्वनियोजित. रिंगण, त्याला येणारे शितोळे सरकारांचे घोडे हे देखील परंपरेने असतात म्हणे. जिथे १०० च्या गर्दीत दांडपट्टा लागावा आणि लाखोंची गर्दी बिनबोभाट चालत राहावी हे दिव्य आहे.
         नंतर मला महत्वाचा वाटलेली सवारी म्हणजे सेवाभावी संस्था आणि असंख्य व्यापारी. कारण आस्तिक प्रत्येक जण असेल च अस सांगता नाही येत किंवा असला तरी प्रत्येकाला वारीत भाग घेता येईलच हे ही कठीणच आहे. मग वारकऱ्यांची थोडी फार सेवा करून आपण थोड पुण्य पदरात पाडून घ्यावं असा तरी उद्देग असणारे किंवा नास्तिक असले तरी ' माणूस ' म्हणून या प्रवाशांची फुल ना फुलाची पाकळी अशी सेवा करणारे यांचा मला विशेष आदर आहे. ठीके दोन्ही नाही तर असंख्य छोट्या व्यापारी यांचा जीवनावश्यक गरजा किंवा निकड भागवण्यासाठी माफक शुल्क घेऊन काम करणाऱ्यांची संख्या ही भली मोठी. मग त्यात अन्न, वाहतूक, निवास, आरोग्य यावर मोठं अर्थशास्त्र अवलंबून आहे.
         परत आले अभ्यासू आणि जिज्ञासू. भारतीय तर आहेतच शिवाय वारी ही कुतूहल आणि अभ्यास म्हणून करणारे कित्येक परदेशी ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. बीबीसी नी वारीची दखल घेतली तेव्हा पासून ती जगात पसरली अस म्हणतात. काही जपानी महिला ३० हून अधिक वर्ष अभ्यास म्हणून वारी करतात अस ऐकून आहे. आणि MBA विद्यार्थी प्रोजेक्ट म्हणून हे विषय घेतात हे ही पाहण्यात आलाय. कारण काही का असेना पण आपली परंपरा जगात दिसतेय हे ही नसे थोडके.
         आता शेवट थोडा सुखदायी आणि थोडा विचार करण्या जोगा. एखादे वेळी ८ तास ८ पाहुणे आले तरी काय करू कस करू होऊन चिडचिड होऊ शकते तिथे दरवर्षी ८ लाख पाहुणे ८ दिवसापेक्षा जास्त येतात तरीही पंढरपूर आणि चंद्रभागेच अगत्य जराही कमी नाही होतय ते प्रत्येकाला सामावून च घेतय. पण त्या बदल्यात आपण त्यांना काय देऊ शकतो ? खरं तर धन्यवाद सोडून काहीही नाही. पण आपण सुसंस्कृत अतिथी आहोत, कुठेही गेलो तरी आपला वावर हा नेहमी निरुपद्रवी कसा असेल याची आपण काळजी घेतो मग अजाणते पणी आपल्या कडून अती प्रमाणात कचरा, प्लास्टिक बाटल्या, निर्माल्य जे नदी मधे अडकून पडत, दुर्गंधी येणारे पदार्थ हे इकडे तिकडे पडून त्याचा त्यांना त्रास होऊ शकत. तिथे त्या दिवसात काही टन मलमुत्र जमा होत आणि त्याचा दुर्गंध काही आठवडे राहतो अस वृत्तपत्रात वाचलेलं मला आठवत. आता मलमुत्र विल्हेवाट ही सोय प्रशासन करू शकत कारण त्या सोयी त्यांच्या कडे आहे हे अगदी मान्य, पणं इतर कचरा व्यवस्थापनात सेवाभावी संघटना येत आहेत हे कौतकास्पद आहेच त्यात निदान साथ देऊन काम हलक केलं तर पंढरी ला कृतज्ञता दिसेल किमान. आणि अतिथी देवो भव चां त्यांचा बाणा कायम ठेवण्यात त्यांना धन्यता वाटेल
          आता शेवटी वर कुठेही उल्लेख न केलेली सवारी  आहे एक जी आजकाल जास्त भरती झाली आहे ते म्हणजे हौशी फोटोग्राफर, कवी , लेखक जे आपापल्या नजरेन वारी लोकांना दाखवतात. आणि त्याला कल्पक झालर लावतात...!!
         तशी वारी खूप लोकांना माझ्याहून जास्त माहीत आहे पणं मला समजलेली वारी मी शब्दात मांडली बाकी चूकभूल क्षमा असावी
            ' बोला पुंडलिक वरदे.....!!!'

©प्रसन्न कुलकर्णी [PK]

Comments